Tuesday, May 12, 2020

नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणेबाबत.

प्रती,
मा. अण्णासाहेब मिसाळसर, भा.प्र.से.
आयुक्त तथा प्रशासक, 
नवी मुंबई महानगरपालिका
विषय : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणेबाबत:-
सर,
दोनच दिवसापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेवून आरोग्य विभागात सर्व कामगारांची भरती प्रक्रिया सुरू करा. नियमानुसार कामगारांना बढती द्या, असे त्यांनी सर्व पालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात वर्षानुवर्षे ठोक मानधनावर काम करत आहेत. त्यांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. नवी मुंबईकरांना नागरी सुविधा पुरविण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे महत्वपूर्ण काम या ठोक मानधनावरील कामगारांकडून करण्यात येत आहे. कोरोना काळातही हे कामगार आपल्या जिविताची पर्वा न करता तसेच आपल्या परिवाराचाही विचार न करता नवी मुंबईकरांची सेवा करत आहेत. या सेवेचा कोठेतरी आता प्रामाणिकपणे विचार होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने इतर महापालिकांना भरतीबाबत निर्देश दिले आहेत, त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनात वर्षानुवर्षे ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांचीही सेवा कायम करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश द्यावेत,
जे कामगार ठोक मानधनावर पालिकेत काम करीत आहे. त्यांचा विचार भरतीदरम्यान पालिका प्रशासनाने सर्वप्रथम करावा. त्यांना पालिका सेवेचा अनुभव असल्याने त्यांची सरसकट सेवा कायम करण्यात यावी. आरोग्य विभाग, घनकचरा विभाग,  महापालिका प्रशासनामधील सर्व विभागातील ठोक मानधनावरील कामगारांना पहिले थेट भरती करून घ्यावे. या कामगारांच्या सेवेबाबतचा प्रस्ताव आपण महापालिका प्रशासनाला तात्काळ बनविण्यास सांगावे आणि मुख्यमंत्र्यांकडून तसेच नगरविकास मंत्र्यांकडून या प्रस्तावास मंजुरी मिळवून घ्यावी.
पालिका प्रशासनात काम करताना काही कामगारांची वयोमर्यादाही उलटून गेलेली असणार. तथापि त्यांची पालिका प्रशासनातच सेवा असल्याने माणूसकीच्या निकषावर वय हा मुद्दा हा प्रतिष्ठेचा अथवा तांत्रिक अडचणीचा होवू नये. त्यांना कामाचा अनुभव आहे. बिनअनुभवी कामगार भरती करण्याएवजी याच अनुभवी कामगारांची त्या ठिकाणी वर्णी लागल्यास प्रशासनाचेही नुकसान होणार नाही. मागे यासंदर्भात मा. विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोळे यांची विधानभवनातील दालनात कामगारांच्या कायम सेवेबाबत पालिका अधिकारी व इंटकचे प्रतिनिधी यांची पटोळेसरांसमवेत बैठक झालेली आहे. त्यांनीही महापालिका प्रशासनाला या कामगारांच्या कायम सेवेबाबत निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागात सर्वप्रथम पालिका प्रशासन भरती करणार आहे, त्या भरतीत ठोक मानधनावर बहुउद्देशीय कामगार, परिचारिका, (anm, jnm), लिपिक, कंपाऊन्डर तसेच घनकचरा विभागातील सर्व ठोक मानधनवरील कर्मचारी, जीवाची पर्वा न करता काम करत असून त्यातल्या काहींना कोरोनाची लागणही झालेली आहे. अत्यंत कमी पगारात हे ठोक मानधनावरील कामगार काम करत आहेत. त्यांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली असून मानवअधिकाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपली सेवा आज ना उद्या कायम होईल या आशेने ते पालिका प्रशासनात ते काम करत आहे, त्यांच्या परिश्रमाला आता आपण न्याय मिळवून द्यावा व त्यांची सेवा कायम करण्याविषयी संबंधित विभागाना आपण निर्देश द्यावेत, ही आपणास नम्र विनंती.
आपला नम्र
श्री. रवींद्र सावंत
नवी मुंबई इंटक अध्यक्ष
नेरूळ तालुका कॉंग्रेस अध्यक्ष
दिनांक -११/०५/२०२०

No comments:

Post a Comment